छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ ठरतेय मुख्य आकर्षण; पहिल्या प्रयोगाला शिवप्रेमींची भरभरून दाद

पिंपरी, दि. १८ : – ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या नेत्रदीपक दृश्यांनी निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला शिवप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते या महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसदस्य अमित गावडे, राजू मिसाळ, अभिषेक बारणे, चेतन भुजबळ, नगरसदस्या शैलजा मोरे, अर्चना कारंडे,माजी नगरसदस्य मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे, सागर तापकीर, निलेश शिंदे, प्रकाश जाधव, संतोष सातपुते, आबासाहेब ढवळे, सतीश काळे, संतोष कवडे,श्रीमंत जगताप,नागनाथ म्हस्के, ज्ञानेश्वर लोभे, सचिन आल्हाट, संदीप निकम, कुणाल कांबळे, सचिन बोऱ्हाडे, संदीप बोराडे, सागर लश्करे, स्वप्निल शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. राष्ट्रपती महोदयांसमोर सादर झालेल्या या भव्य महानाट्यप्रयोगात सुमारे २५० हून अधिक कलाकारांनी सहभाग नोंदवत शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रसंग जिवंत केले. घोडे, उंट, भव्य नेपथ्य, पारंपरिक वेशभूषा, अत्याधुनिक प्रकाशयोजना, प्रभावी ध्वनीसंयोजन आणि नेत्रदीपक आतषबाजीच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या प्रत्येक दृश्याला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माआधीचा सामाजिक व राजकीय कालखंड, बालपण, संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भक्ती-शक्ती भेट, तोरणा विजय, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, शेतकऱ्यांसाठीचे आज्ञापत्र, प्रतापगड मोहीम, पन्हाळगड वेढा व सुटका, स्वराज्याच्या आरमाराची उभारणी, पुरंदरचा तह, आग्रा भेट, नरवीर तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा विजय आणि भव्य शिवराज्याभिषेक सोहळा यांसारखे प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आले. या सजीव सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमानाची भावना जागृत होत अनेकांनी उभे राहून या प्रसंगांना दाद दिली.

कार्यक्रमस्थळी नागरिकांसाठी सुयोग्य बैठक व्यवस्था, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे तसेच सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्या अधिपत्याखाली कायदा सुव्यवस्थेसाठी परिसरात २० सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.

दरम्यान, ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आणखी दोन प्रयोग १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी याच ठिकाणी सायंकाळी ६.३० वाजता सादर करण्यात येणार असून नागरिकांनी या भव्य महानाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *