भव्य बाईक रॅलीतून विजयाची चाहूल; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळांचा ठाम विश्वास

पुणे,दि.१३ :- प्रतिनिधी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आज पार पडलेली भव्य बाईक रॅली ही केवळ प्रचारापुरती मर्यादित नसून भाजपाच्या निश्चित विजयाची स्पष्ट नांदी असल्याचा ठाम दावा केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी केला. रॅलीला मिळालेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तरुणांचा प्रचंड जोश आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग पाहता १६ तारखेला हा प्रभाग भाजपाच्याच पारड्यात ४–० ने जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रॅलीदरम्यान संपूर्ण प्रभागात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात, घोषणांच्या गजरात आणि कमळाच्या जयघोषात भाजपाच्या चारही उमेदवारांचे नागरिकांनी जाहीर स्वागत केले. या दृश्यांमधून मतदारांनी आधीच आपला कौल दिल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत होते.

“प्रभागातील चारही उमेदवारांना दिलेले प्रत्येक मत म्हणजे थेट पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास आहे. हे उमेदवार केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रभागाचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास घडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत,” असे स्पष्ट शब्दांत मोहोळ यांनी सांगितले.

भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर भर देताना ते पुढे म्हणाले, “भारतीय जनता पार्टी ही व्यक्तिकेंद्री नव्हे, तर विचारकेंद्री राजकारण करणारी पार्टी आहे. भाजप विचाराने चालते, संस्कृतीने काम करते आणि निष्ठेने जनतेची सेवा करते. इथे कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नाही. पक्षातील प्रत्येक उमेदवार स्वच्छ, प्रामाणिक आणि जनतेच्या विश्वासास पात्र आहे—हाच भाजपाचा खरा बळकटीचा आधार आहे.”

या रॅलीत तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभागातील एकूण वातावरण पाहता भाजपाच्या बाजूने स्पष्ट लाट निर्माण झाली असून विरोधकांसाठी ही स्थिती चिंताजनक ठरत आहे.

“विविध सर्वेक्षणांनुसार पुण्याचा पुढील महापौर भाजपाचाच असणार हे जवळपास निश्चित आहे. प्रभाग क्रमांक ०९ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असून येथील मतदार नेहमीप्रमाणे कमळालाच मतदान करणार,” असा ठाम विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.

एकूणच, आजच्या भव्य रॅलीतून प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजपाच्या विजयाचे ठोस संकेत मिळाले असून, १६ तारखेला हा प्रभाग भाजपाच्या बाजूने ४–० ने झुकणार, असा स्पष्ट राजकीय संदेश संपूर्ण शहरात गेला आहे. त्यामुळे या प्रभागाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *