मुंबई : आपण ज्या मातीतून आलो आहोत, त्या मातीशी आपली नाळ कायम ठेवणारी माणसे राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. अशा नेत्यांच्या यादीत आर. आर. पाटील ऊर्फ आबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल सांगली जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या तासगाव तालुक्यात जन्मलेल्या आबांची जिल्हा परिषद सदस्यापासून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती. संघर्षातून मिळालेले यश डोक्यात न जाऊ देता हा नेता कायम मातीत आणि माणसांमध्येच राहिला. त्यामुळेच सत्तास्थानावर असूनही आर. आर. पाटील या नावापेक्षा ‘आबा’ म्हणूनच ते महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नेते ठरले.
आपल्या मातीशी कायम घट्ट नाळ
सत्तेत उच्चपदावर असतानाही आपल्या मातीशी कायम घट्ट नाळ जोडून राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे आर.आर. पाटील आबा.. सत्तेचा उपयोग जनहिताचे निर्णय घेण्यासाठी कसा करायचा याचा एक आदर्श त्यांनी राज्यकर्त्यांसमोर ठेवला. संवेदनशील तितकेच कणखर मन, जनमानसांबद्दल असणारा कळवळा आणि जनतेसाठी कल्याणकारी कार्य करण्याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ते शक्तीस्थान होते. त्यांची उणीव पक्षाला आणि महाराष्ट्राला नेहमी जाणवत राहील.
गरिबीतून शिक्षण
गरिबी क्लेशकारक असते, याचा अनुभव घेतला आहे. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचेच कपडे घालून शिक्षण पूर्ण केले. ‘कमवा व शिका’ योजनेत मातीच्या पाट्या वाहिल्या. त्यातून मिळालेल्या पैशातून बहिणीचे, स्वत:चे शिक्षण पूर्ण केले… सत्य तेच बोलायचे… हे ध्येय ठेवून काम केल्यामुळेच एक सामान्य मुलगा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकला, असा जीवनपट आर. आर. पाटील यांनी बारामतीच्या शारदा व्याख्यानमालेत उलघडला होता. तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले होते.
*कमवा आणि शिका*
आबांचे वडील सरपंच असले, तरी घरची परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. सांगलीमध्ये प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या ‘शांतिनिकेतन’मध्ये ‘कमवा शिका योजने’तून आबांनी शिक्षण घेतले. अत्यंत साधे कपडे, पायात स्लिपर, कॉलेजला जाताना हातात एक-दोन वह्या घेऊन आर. आर. जायचे. प्रचार्य पाटील आणि नागनाथअण्णा नायकवडी आबांसाठी गुरूस्थानी होते. आबांमध्ये वक्तृत्वगुण होते. वक्तृत्व स्पर्धांमधून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून शिक्षणाचा थोडाफार खर्च भागायचा. अशाच परिस्थितीत आबांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.
*जिल्हा परिषद सदस्य ते ऊप मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास*
त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संपतराव माने यांच्या घरी ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मागायला यायचे. तिकीट मिळाले अन् ते निवडूनही आले मग त्यांनी ११ वर्षे त्यांनी जिल्हा परिषद गाजवली. वसंतदादा पाटील यांचे बोट धरून आबांनी राज्याच्या राजकारणात घौडदौड सुरू केली. पुढे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून आबांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणाला झाली. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे प्रथम जिल्हा परिषद, नंतर विधानसभेतही गाजली. ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून त्यांचा गौरवही झाला. अभ्यासू आमदार, उत्कृष्ट वक्ता म्हणून सर्वत्र त्यांचा नावलौकिक झाला. एक नोव्हेंबर २००४ रोजी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २००३ ते २००८ आणि २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणूनही काम सांभाळले. आर. आर. पाटील यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. या काळात त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध विकासकामे करून नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. गृहमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्यातील डान्सबार बंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे विविध सामाजिक स्तरांतून स्वागत करण्यात आले होते.
सभा गाजवणारे नेते
राज्यात सभा गाजविणाऱ्या नेत्यांमध्ये आबा आघाडीवर होते. प्रत्येक निवडणुकीवेळी प्रचारासाठी शरद पवार यांना वेळ नसेल, त्यावेळी कार्यकर्ते ‘आबां’ना पाठवा म्हणून आग्रह धरत. राज्यातील कानाकोपऱ्यातून त्यांच्या सभांची मागणी असे. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे ही सभा जिंकणारी नेते मंडळी अचानक जग सोडून गेली. त्याच श्रृंखलेत आता आबाही जाऊन बसले.
आबांचे व्यक्तिमत्त्व
वसंतदादा पाटील यांची आठवण करून देणारा नेता, गोरगरिबांची दु:खे समजून घेणारा, अत्यंत साध्या राहणीचा, सदैव जनतेच्या हाकेला ओ देणारा नेता, तितकाच संवेदनशील, मितभाषी आणि तितकाच हजरजबाबी, अशी आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगता येतील. चीन दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळातील आबांच्या सहभागावर बरीच चर्चा झाली. त्यावर ‘चीनमध्ये कमी उंचीची माणसे असतात. आता पक्षात किंवा मंत्रिमंडळात कमी उंचीचे कोण आहे, तर मी. त्यामुळेच शरद पवार साहेबांनी चीन दौऱ्यासाठी माझी निवड केली असावी,’ असे म्हणत आबांनी एका पत्रकार परिषदेत हशा पिकविला होता.
आबा मंत्री होते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, तरीही ते सर्वसामान्यांचे होते. पत्रकार असो किंवा सामान्य नागरिक कोणालाही केव्हाही ‘अॅक्सेसेबल’ अशी त्यांची ख्याती होती. मंत्रालयात छोटेसे काम घेऊन आलेल्या गावाकडच्या माणसाशीही ते आपुलकीने बोलायचे म्हणूनच त्यांची लोकप्रियता अबाधित राहिली.
विविध समाजसेवक निवडणूक प्रचाराला येत
राजकारणात जवळपास चाळीस वर्षे काम करूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. शरद पवार यांनी जवळपास दहा वर्षे राज्याच्या गृहखात्याची आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा आबांकडे सोपविली. त्यातच पवारांचा आबांवरील विश्वास अधोरेखित होतो. विविध पक्षांच्या नेत्यांवर तोफा डागणारे अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्यासारखे नेतेही आबांच्या निवडणूक प्रचाराला आले होते. तेथेच आबांच्या नैतिकतेवरही शिक्कमोर्तब झाले होते.
मुुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत