पुणे दि २०:- आषाढी वारीला लाखो पावले विठूनामाचा गजर करत, डोईवर तुळस आणि खांद्यावर पालख्या घेऊन विठ्ठवरखुमाईच्या भेटीला जातात. यंदाचा आषाढी एकादशीचा उत्सव 20 जुलै 2021 रोजी साजरा होणार आहे. मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही वारी सोहळ्यावर कोरोनाच्या संकटाचे सावट आसल्याने. या संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनुसार राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून पालख्या जाणार आहेत.मानाच्या 10 पालख्यांसाठी धावणार लालपरी पंढरपूरच्या वारीतल्या 10 मानाच्या पालख्यांसाठी राज्य परिवहन मंडळाची लालपरी यंदा धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला नेण्याचा मान लालपरीला मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वारीसोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.कोरोनाच्या काळातही जपली वारीची परंपरा
यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत वारी सोहळा साजरा करण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी वारकरी समुदायाकडून केली जात होती. मात्र पायी वारीऐवजी राज्यातल्या 10 मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 19 जुलै 2021 रोजी या 10 मानाच्या पालख्या 19 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होतील संबंधित संस्थांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्यासाठी विनामूल्य एसटी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एसटी विभागाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या जिल्ह्यातल्या संस्था, विश्वस्तांना भेटून मानाच्या पालख्यांसाठी बस उपलब्ध करून देत असल्याचा विश्वास द्यावा अशा सूचना परब यांनी केल्या.वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी बसचे होणार निर्जंतुकीकरण या 10 मानाच्या पालख्यांचा प्रवास त्यांच्या मूळ ठिकाणापासून पंढरपूरच्या वाखरीपर्यंत राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून होईल. यानंतर त्या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने या सर्व बसचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. या प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील असेही परब यांनी सांगितले आहे.