पुणे, दि. 14 – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यामधील 35 हजार 163 मजुरांना घेऊन पुणे विभागातून 28 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 11, उत्तरप्रदेशसाठी 11, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 1 राजस्थानसाठी 3 व बिहारसाठी 1 अशा एकूण 28 रेल्वेगाडया 35 हजार 163 प्रवाशांना घेवून रवाना रवाना झाल्या आहेत. 15 मे रोजी पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 3 रेल्वेगाडया नियोजित असून यामध्ये एकूण 3600 प्रवाशी अपेक्षित आहेत.यापैकी पुणे स्थानकावरून तीन रेल्वेगाडयांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच उत्तरप्रदेशसाठी तीन रेल्वेगाडयांचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये 4 हजार 312 प्रवाशी अपेक्षित आहेत. यापैकी पुणे रेल्वे स्थानकामधून एकू तर कोल्हापूर रेल्वे स्थानकामधून दोन रेल्वेगाडयांचे नियोजन आहे तर बिहारसाठी कोल्हापूर स्थानकामधून एक रेल्वेगाडी नियोजित असून एक हजार 456 प्रवाशांचे नियोजन या रेल्वेगाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यासाठी सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली असल्याचेही असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.